आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पराभूत होणार : अखिलेश   

लखनौ : उत्तर प्रदेशात १.९३ लाख शिक्षक भरतीची नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात ही राजकीय जुमला आहे. यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप पराभूत होईल, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
 
यादव यांनी ’एक्स’वर पोस्ट करत लाखो नोकरदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निराशेतून निर्माण होणारे ’राजकीय प्रतिक्रियेचे गणित’ मांडले. प्रत्येक पदासाठी किमान ७५ इच्छुक गृहीत धरले तर किमान पावणेदोन कोटी  उमेदवार होतील. प्रत्येक उमेदवारामागे कुटुंबातील केवळ दोन सदस्यांचा समावेश केल्यास मतदारांची संख्या ४ कोटी ३४ लाखांहून अधिक होईल. उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा मतदारसंघांमध्ये ही संख्या विभागल्यास प्रत्येक जागेवर १.०८ लाख मतदार होतील. जर या आकडेवारीपैकी अर्ध्याहून अधिक भाजप मतदात्यांची असली तरही, भाजप प्रत्येक मतदारसंघात ५४ हजार मतांचा फरक कमी करेल. असे झाल्यास भाजप २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत होईल.  
 
२०२४ ची पोलिस भरती भाजपला राज्यातील जवळजवळ अर्ध्या जागा गमवण्यास कारणीभूत ठरली. उत्तर प्रदेश सरकारने समाजमाध्यमावर पोस्ट करून तीन टप्प्यात १.९३ लाख शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली. तथापि, ही पोस्ट नंतर हटविण्यात आली. अधिकारी यात कोणतीही स्पष्टता देत नाहीत.
 

Related Articles